चला प्रकाश येऊ द्या


सर्व वाचकांना प्रकाशमय दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा, 

तुमच्या आयुष्यात चैतन्य येऊन  ते अधिक देखणे आणि मन्गलमय व्हावे हि ईशवर चरणी प्रार्थना, 

 हा दीप उत्सव नवीन वाट दाखवून त्यावाटेने  प्रवास करण्यासाठी नक्कीच आपणास मदत करणार असा विश्वास वाटतो. 

दिवाळीच्या दिवसात सर्वत्र कडाक्याची थंडी आणि शाळेला दांडी,  त्यात आनंदात भर घालण्यासाठी,  वातावरणात चैतन्य भरण्यासाठी घरोघरी प्रकाशमान झालेल्या पणत्या मन मोहून टाकतात. 


एकमेकांच्या घरी जाऊन एकत्र फराळाची चव चाखण्याची मजाच काही और असते. 

तो आठवडा फक्त अनुभवता येतो शब्दात वर्णन करणे माझ्यासाठी अशक्य आहे. 

या सर्व आठवणी जिवन्त करणारा म्हणूया नाही तर त्यात भर घालणारा आजचा दिवस आहे. 

हि दिवाळी सर्वांसाठी एकाच दिवशी येत असली तरी एक सारखी नसते; कोट्यवधी लोकांच्या डोळ्यात आनंदाचे तर लक्षावधी लोकांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू तरळत असतात. 

काही घरातील करते स्त्री-पुरुष देशाच्या सेवेत व्यग्र असतात त्यांच्या आई-वडिलांच्या  तोंडात पुरणपोळीची चव गोड राहत असणार का? 


ज्यांचे जन्म दाते हे जग सोडून गेले त्या मुलांना आई-बाबा नसताना दिव्यांकडे पाहून काय वाटत असेल? 

या महामारीत ज्यांच्या घराला कायमचे टाळे लागले त्या घरातील अंधार पाहून शेजाऱ्यांच्या काळजात गेल्या वर्षाच्या आठवणी टोचत नसतील का? 

काही अतिउत्साही तरुण फटाके फोडताना चुकून झोपडीला जाळतात त्या झोपडीतील कुटुंबाची दिवाळी कशी होत असणार? 

ज्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयात यम दूताविरोधात प्राण पणाला लावून लढतो आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला कळतात का? 

शेकडो / हजारो दिवे लावणाऱ्यांना ज्या घरात तेल नाही त्यांचे सोयंपाक घर दिसत असेल का? 

आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाचे तोंड गोड  करायला आपणास फुरसद आहे का? 


शेवटी या उत्सवात येन-केन कारणाने सहभागी होऊ न शकणाऱ्या स्वकीयांकडे पाहायला आपल्याला वेळ आहे का? 

याचे उत्तर शोधा आणि अंधःकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या शुभ दिनी आपण भानावर आहोत का स्वतःला विचारा. 

घरावर / कार्यालयावर रोषणाई नक्की करा पण त्यापूर्वी ज्या चुली पेटल्या नाहीत त्या घरातील दिवा लावा..  

मजा मस्ती नक्की करा पण ज्यांना अंग झाकायला कपडे नाहीत त्यांच्याकडे एक नजर टाका..  

महागडे फटाके नक्की उडवा पण त्याचबरोबर ज्यांच्या पोटात कावळे ओरडतात तो आवाज देखील ैका..   

अनाथांच्या, दारिद्र्यात होरपडणाऱ्यांच्या, परिस्थितीशी झगडून जायबंदी झालेल्यांच्या, भुईवर भर म्हणून घरातच राहून घरपणासाठी आसुसलेल्यांच्या डोळ्यात प्रकाश आणि मनात उत्साह जर आपण निर्माण करू शकलो तर ती खरी दिवाळी ठरेल. 

माझ्या बाबतीत दीप उत्सव कायम स्फूर्ती देणारा राहिला 

गेल्या २२ वर्षांपूर्वी एका दिवशी माझा जन्म झाला होता; इतरांच्या दृष्टीने हि काही नोंद घेण्यासारखी ऐतिहासिक घटना नसली तरी तो दिवस उगवला म्हणून मी या जगात पाऊल ठेवू शकलो हे सत्य आहे. 

तसं ते प्रत्येकाच्या बाबतीत लागू पडते. 


माझ्या जन्मापासून सर्वाधिक आनंद देणारा उत्सव जर विचारला तर दिवाळी हेच उत्तर असेल त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत: 

दिवाळी जवळ आली कि शाळेला सुट्ट्या,  हॉस्टेल मधून घरी परतण्याचा स्वर्गीय आनंद,  घरी आल्यावर चविष्ट पदार्थांवर ताव मारण्याची संधी मिळते;  हे काही सांगायलाच नको लहान होतो तेव्हा मामाच्या घरी जाण्याची उत्सुकता शिगेला पोहचली कि मामाचं गाव जवळ करायचे;  हे आणि अस किती तरी सांगता येईल. 

आता तरुण झालो तसं  दीप उत्सवाचं स्वरूप देखील बदललं 

भाऊबीजेच्या दिवशी ताई घरी येणार,  भाचे घर डोक्यावर घेतील;  या सर्वांमध्ये काही दिवस गेल्यावर परत रूढलेल्या वाटेवर पाऊले पडणार हे तर अटळ आहे. 

बहीण-भावाच्या नात्याला भाऊबीज आणि रक्षाबंदन या गोष्टींची गरजच नसते ते नातेच वेगळे आहे त्यात फक्त आपुलकीची भावना पाहिजे 


रक्षा एका नात्याची 


तरी देखील ४-८ दिवस रममाण होऊन पुढच्या प्रवासाला नवीन ऊर्जा घेऊन सुरुवात करण्यासाठी हा प्रकाशाचा उत्सव शक्ती देतो म्हणून काही दिवस जरा डोक्यात देखील प्रकाश पाडू.. 

प्रकाशाच्या उत्सवात न्हाऊन जाण्यासाठी सर्वाना हार्दिक शुभेच्छा 


 Photo Credit - Pixabay


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा